Sunday 2 October 2011

बाभळीचे पाणी पेटले बंधार्‍याचे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न; कार्यकर्त्यांना अटक व सुटका

(03-10-2011 : 2:05:23)


धर्माबाद। दि. २ (वार्ताहर)
‘छावा’चे अण्णासाहेब जावळे व इतरांना बाभळी बंधार्‍याकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले.
महात्मा गांधी जयंतीदिनी बाभळी बंधार्‍याचे दरवाजे बंद करण्याचा इशारा देऊन आंदोलन करणार्‍या ‘छावा’च्या ४७५ कार्यकर्त्यांना बंधार्‍यावर पोहोचण्यापूर्वीच अटक करून त्यांची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी इळेगाव, बाभळी, मोकली येथे नाकेबंदी केली. चार पोलीस उपअधीक्षक, दहा पोलिस निरीक्षक व ५00 ते ६00 पोलिसांचा ताफा बंदोबस्ताला होता. नदीपात्रात दोन बोटींवर सशस्त्र जवानही तैनात होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आंदोलनामुळे भंग होऊ नये म्हणून मध्यरात्रीपासूनच बाभळी परिसरात प्रशासनाने संचारबंदी लागू केली होती. आंदोलनापूर्वी आयोजित शेतकरी मेळाव्यात ‘छावा’चे संस्थापक अण्णासाहेब जावळे म्हणाले, २00 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला आहे. हे पैसे वाया जाऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आमच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. तर हे काही राजकीय आंदोलन नसून शेतकर्‍यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी अहिंसक लढा आहे. मेळाव्यानंतर बाभळी बंधार्‍याकडे कूच करणार्‍या जावळे यांच्यासह लक्षमण शिरसाठ, अप्पासाहेब कोरे, भीमराव पाटील, पंजाबराव काळे, विजय घाडगे, सतीश शिंदे, सुनील बाभळीकर, शिवराज चोळाखेकर आदी कार्यकर्त्यांना अटक केली. त्यांनाही चंद्राबाबू नायडू यांच्याप्रमाणे आयटीआयमध्येच ठेवण्यात आले होते.

गनिमी कावा फसला

‘छावा’च्या कार्यकर्त्यांना पोलीस सहज बाभळीपर्यंत जाऊ देतील, अशी स्थिती नव्हती, त्यामुळे काही कार्यकर्ते ७ ते ८ कि.मी. अंतरावरून नदीपात्राने पोहत जाऊन बाभळीचे बंधारे बंद करण्यास निघाले होते; मात्र नदीपात्रात बोटींवर सशस्त्र जवान तैनात करून ठेवल्याने हा प्रयत्न फसला.

http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=AurangabadEdition-5-1-03-10-2011-cfdb0&ndate=2011-10-03&editionname=aurangabad

No comments:

Post a Comment